काल बाणेर-पाषाण लिंक रोडवरील एका अभियंत्याची बातमी वाचून मन खिन्न झाले. तेथील एका संगणक अभियंत्याने (जयेश पटेल व पत्नी भूमिका) कुटुंबासह आत्महत्या केल्याचे आढळून आले. लहान मुलाचे (नक्ष पटेल) सततचे आजारपण आणि त्यात त्याचा मृत्यू (पोलिसांच्या अंदाजाप्रमाणे) झाला व ते सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचले. खरे तर माझ्या मते हि घटना ह्या नव्या कुटुंब व्यवस्थेवर जीवनमानावर प्रश्नचिन्ह उभे करते. एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास, छोट्या कुटुंबाची अपेक्षा आणि छोट्या कुटुंबातील आजारपणामुळे,छोट्या छोट्या भांडणांमुळे व इतर घटनांमुळे आलेल्या ताणतणावाचा निचरा न झाल्यामुळे अशा घटना घडतात. एकत्र कुटुंबांमध्ये एकमेकांची सुख दुःख हि वाटून घेतली जातात. ताणतणाव हे एकमेकांशी बोलल्याने कमी होतात. आणि सर्व लोक सोबत असल्यामुळे आलेली नैराश्याची भावनासुद्धा निघून जाते. त्यामुळे वरील सारख्या घटना फारच क्वचित घडून येतात.
त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हि कधीही उत्तमच. यात तोट्यांपेक्षा फायदेच जास्त आहेत. तोट्यामध्ये प्रायव्हसी नसणे व इतरांकडून असलेल्या काही अपेक्षा हे कदाचित मला माहित असलेले काही तोटे. पण सुख दुःख्खाचे प्रसंग, मुलांचे संगोपन, परिवारातील आजारपणं, कामाच्या ठिकाणचे ताणतणाव व त्यामुळे आलेली नैराश्याची भावना हे हि एकत्र कुटुंबात जाणवत नाही. त्याच बरोबर मुलांवर घातली थोरा-मोठ्यांकडून होणारे संस्कार, प्रत्येक गोष्ट वाटून घेण्याची मुलांना लागलेली चांगली सवय हे याचे काही चांगले फायदेही आहेत. पण काही कुटुंबाच्या बाबतीत सुदैवी असतीलच असे नाही. कारण नोकरीनिमित्त परगावी राहत असल्यामुळे सर्वानाच एकत्र राहणे जमेलच असेही नाही परंतु सर्वांनी एकमेकांशी नियमित बोलणे, भेटणे यामुळेही कुटुंब एकत्र असल्याचीच भावना येते. म्हणूनच कुटुंबियांशी, शेजाऱ्यांशी नियमित संवाद (वि-संवाद नव्हे) ठेवून आपल्या कुटुंबाला मानसिक दृष्ट्या सबळ ठेवणे कधीही योग्यच.
आवडला तर नक्की शेअर करा...
आपला,
राजेश बबनराव शिंदे

Comments